ठळक बातम्या

    वणी येथे महाराष्ट्र दिनी विदर्भवाद्यांचे आंदोलन ‘काळा दिवस’ म्हणून निषेध

     ६५ वर्षांच्या अन्यायाचा आरोप; विदर्भावर जबरदस्तीने लादलेल्या विलिनीकरणाविरोधात संताप

    विदर्भवार्ता । प्रतिनिधी 

    वणी/ दि. १ मे — महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विदर्भवाद्यांच्या वतीने आज वणी येथे ‘काळा दिवस’ पाळत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित आंदोलन व निदर्शन करण्यात आले

    आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत महाराष्ट्र स्थापनेपासून विदर्भावर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप केला. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, मात्र त्या वेळी विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा न देता जबरदस्तीने महाराष्ट्रात विलीन करण्यात आले, असा ठाम आरोप यावेळी करण्यात आला. गेल्या ६५ वर्षांत विदर्भातील शेतकरी, तरुण, उद्योग आणि पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांमध्ये अन्याय झाल्याचे आंदोलकांनी नमूद केले.

    या आंदोलनात उपस्थितांनी शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, कुपोषण, अपुरी सिंचन व्यवस्था, उद्योगांचा अभाव आणि वीज दरवाढ या प्रमुख मुद्द्यांकडे लक्ष वेधले. “विदर्भाला न्याय द्या”, “स्वतंत्र विदर्भ राज्य द्या” निषेध असो निषेध असो महाराष्ट्र दिनाचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

    या प्रसंगी प्रा. पुरुषोत्तम पाटील, रफिक रंगरेज, अँड. राहुल खारकर, बाळासाहेब राजुरकर, देवराव धांडे, अजय धोबे, अमित उपाध्ये, नामदेव जनेकर, संजय चिंचोलकर, विकेश पानघाटे, पुंडलिक पथाडे, अशोक चौधरी, वी.भी. टोंगे, गजेंद्र भोयर, प्रभाकर उईके, होमदेव कन्नाके, उद्धव हेपट, कृष्णदेव विधाते, काशिनाथ जेउरकर यासह विदर्भवादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







    Photo