लोकशाही हक्कांचे संरक्षण करा, दोषींवर कठोर कारवाई करा; विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसची ठाम भूमिका
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ वणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा. संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेसने ठाम भूमिका घेतली.
निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच जखमी विद्यार्थ्यांना तातडीने दर्जेदार वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देत योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी आणि भविष्यात शांततामय आंदोलनांवर कोणत्याही प्रकारचा बळाचा वापर केला जाणार नाही, याबाबत शासनाने स्पष्ट हमी द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकशाही व्यवस्थेत विद्यार्थ्यांना आपली भूमिका शांततामय मार्गाने मांडण्याचा संविधानाने दिलेला अधिकार आहे. हा अधिकार दडपण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारा असून, विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न काँग्रेस कदापि सहन करणार नाही. संविधान, लोकशाही आणि न्यायव्यवस्थेच्या संरक्षणासाठी काँग्रेसचा संघर्ष भविष्यातही अधिक तीव्रतेने सुरू राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी देविदासजी काळे, टीकारामजी कोंगरे, विकेश पानघाटे, जय आबड, तेजराज बोढे, पुरुषोत्तम आवरी, वंदना आवरी, शामाताई तोटावार, वंदना धगडी, शालिनी रासेकर, जयसिंग गोहकार, राजू अंकतवार, शंकर वऱ्हाटे, भाऊराव कावडे, मोरेश्वर पावडे, अनिल भोयर, रुपेश ठाकरे, प्रमोद लोणारे, पलाश बोढे, मनीष खाडे, रवींद्र कांबळे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





